Gudi Padwa : गुढीपाडवा महत्व , गुढी का व कशाप्रकारे उभी करायची? जाणून घ्या संपूर्ण माहिती !
Gudi Padwa : आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीशी नाळ जोडलेले आपण भारतीय नागरिक. सण, व्रतवैकल्ये, परंपरा हा सांस्कृतिक वारसा जपणारा माणूसच या भारत भूमीशी खऱ्या अर्थाने पुत्रवत आचरण करत असतो. कारण आपली नाळ आपल्या या मातीशी जोडलेली आहे. आपण आपली संस्कृती जोपासून, तिला पुढच्या पिढीकडे संस्कार रूपाने सोपवून आपले कर्तव्य करत असतो. यामुळे आपल्या धर्माशी, भूमातेशी असलेली कृतज्ञतेची भावना जोपासली जाते. गुढीपाडवा हा सण मुख्यता नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो.चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाढवा हा सण साजरा केला जातो. या वेळी महाराष्ट्रात जल्लोष्यात मिरवणुका काढल्या जातात.
नूतन वर्षाचा प्रारंभ…. अर्थातच चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा…
नूतन वर्षाचा आरंभ म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा! आपल्या भारतीय संस्कृतीत शंकर महादेव व पार्वती मातेला परमोच्च स्थान आहे. सर्वसामान्य लोकांपासून सर्व स्तरातील लोकांना आदिपुरुष महादेव व आदिशक्ती पार्वतीमाता बद्दल अपार श्रद्धा आहे .
शिवशक्ती ही निसर्गाची उत्पत्ती करते. शिवा शिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहेत. आपल्या कुळाचा सांभाळ करणारे आणि उत्पत्ती करणारे हे आपले आराध्य दैवत. आपल्या या पवित्र परंपरागत हिंदू संस्कृती , कृषी संस्कृती, शेतीसंबंधी कामे आणि त्यासंबंधी ऋतुचक्राप्रमाणे येणारे सण उत्सव या सर्वांमध्ये भगवान शिव आणि आदिशक्ती पार्वतीचे अनेक संदर्भ आपल्याला बघायला मिळतात. या आराध्य दैवतांची आपल्या परंपरा , सण, समारंभ , उत्सवात गुंफण झालेली आपणांस दिसून येते. या परंपरेच्या अनुषंगाने येणाऱ्या सणांमध्ये गुढीपाडवा हा वर्षारंभीचा आणि अत्यंत महत्त्वाचा सण आहे.
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या दिवशी महादेव व पार्वती यांचा विवाह ठरला, त्या आधी म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला ( होळीला) वधू वर यांची पसंती झाली. त्या प्रेमाचा रंगोत्सव म्हणून रंगपंचमी.
भारतभर चैत्र शुक्ल तृतीया गौरीतीज म्हणून साजरी केली जाते.
चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस देवीचे चैत्री नवरात्र ही मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते .
चैत्र नवरात्र मधील देवीपूजा ही वार्षिकी म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी केली जाणारी पूजा आहे. जी गुढीपाडव्याच्या दिवशी केली जाते. हिंदू धर्माच्या नवसंवत्साराची सुरुवात त्यामुळे पवित्र आनंददायी होते अशी आपली लोकश्रद्धा आहे!
गुढीपाडवा या दिवशी भगवान शंकर आणि आदिमाया पार्वती यांचा विवाह निश्चित झाला असे निवेदन शास्त्रात आहे .
गुढीपाडवा या दिवशी नवदुर्गेचे देखील पूजन केले जाते. अनेकजण या दिवशी दुर्गा देवीचा उपवास देखील धरतात. असे म्हटले जाते कि या दिवशी देवीची उपासना, पूजा केल्याने मानसिक समाधान, प्रापंचिक समाधान प्राप्त होवू साधकाची प्रगती होते. भक्तावर दुर्गा मातेच्या आशीर्वादाचा वर्षाव होवू भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अनेक त्रासापासून भक्ताची मुक्तता होते. या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पारायण देखील करतात. या दिवशी दुर्गा कवच, दुर्गा स्तुती, दुर्गा सुक्त चे पठण केले जाते.
Marathi Ukhane for Female | मराठी उखाणे |Marathi Ukhane For Male

काही ग्रंथांमध्ये लिहिले आहे कि या गुढीपाडवा दिनी ब्रह्म देवाने या विश्वाची निर्मिती केली. त्यामुळे या दिवशी ब्रम्ह देवाची पूजा, उपासना देखील केली जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी गरिबांना, गरजूंना अन्नदान, कपडे दान केले असता नक्की लाभ मिळतो. अनेकजण या दिवशी नवीन वस्तू, नवीन गाडी, सोन्याच्या वस्तू खरेदी करतात.
गुढीपाडवा दिवशी काही शुभ मुहूर्त देखील सांगितल्या जातात.
यावर्षी ज्योतिष शास्त्रानुसार काही मुहूर्त सांगण्यात आले आहे. पहाटे ४.४१ ते पहाटे ५.२७ पर्यंत ब्रम्ह मुर्हुत सांगण्यात आले आहे. दुपारी २.२० पासून ते ३.१९ वाजेपर्यंत विजय मुहूर्त सांगण्यात आले आहे. ६.३७ ते ७ वाजे पर्यंत संध्याकाळचे शुभ मुहूर्त सांगितले आहे. दुपारी 12 ते १ वाजेपर्यंत ज्योतिष्य शास्त्र नुसार अभिजित मुहूर्त सांगण्यात आले आहे. ज्योतिष नुसार या दिवशी इंद्र योग तयार होत असतो.
गुढी का व कशाप्रकारे उभी करायची?
बांबूच्या काठीवर लिंबाची डहाळी, साखरगाठीची माळ, पुष्पहार, जरीचे वस्त्र त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश, त्याला हळदी कुंकवाची बोटे ओढलेली आणि सुंदर स्वस्तिक शुभचिन्ह म्हणून रेखाटलेले असते. गुढीला उभारण्यासाठी खाली पाट, त्यावर सुपारी पानाचा विडा, श्रीफळ, नैवेद्य… अशी सर्वच ठिकाणी गुढीची उभारणी करतात.
कलश हे यशाचे प्रतीक लिंबाची डहाळी हे आरोग्याचे प्रतीक, पुष्पहार मांगल्याचे, साखरगाठीची माळ हे मधुर्याचे, जरीचे वस्त्र हे वैभवाचे, बांबू म्हणजेच वेळूची काठी हे सामर्थ्याचे, पानसुपारीचा विडा हे संकल्पचे, हळदीकुंकू सौभाग्याचे, श्रीफळ हे सिद्धीचे, पाट हे स्थैर्याचे, अक्षता हे अक्षय्यतेचे प्रतीक म्हणून गुढी ही मांगल्याचे, सौभाग्याचे प्रतीक म्हणून प्रत्येक दारी मानाने उभी असते. गुढीला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो.
गुढी हे स्त्रीदेहाचे प्रतीक आणि गुढीच्या टोकावर उपडी घातलेले भांडे हे गुढीचे मुकुटधारी मस्तक असा समज आहे. गुढी हे माता पार्वतीचे मुकुटधारी मस्तक आहे. गुढीला नवीन जरतारी वस्त्र नेसवतात जसे लग्न विवाह प्रसंगी पार्वती मातेला सजवले गेले होते.
गुढीच्या गळ्यातील हार हा मिठाईचा असतो तो मुळात पार्वतीच्या गळ्यातील सुवर्णालंकार आहे . गुढीसाठी वस्त्र वापरणे हा मातृसत्ताक अथवा स्त्रीसत्ताक पद्धतीचा आदर आहे.
आपल्या हिंदू धर्मात भारत वर्षात गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका ऐकिवात आहेत. प्रभू श्रीरामांनी रावणाचा पराभव करून अयोध्येत विजय मिळवला. शालिवाहन संवत्सराची सुरुवात सम्राट शालीवाहन यांनी शत्रूंवर विजय मिळवून एक नवे युग सुरू केले. हिंदू धर्मशास्त्रानुसार ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली तो हा पवित्र दिवस.
या धार्मिक आख्यायिकांसोबतच निसर्गशास्त्र सुद्धा गुढीपाडव्याशी निगडित आहे. भरघोस पीक येण्यासाठी याच वेळेला शेतीसाठी जमिनीची मशागत केली जाते.
असे म्हटले जाते कि गुढी उभारल्याने वाईट आत्मापासून आपल्या घराची सुरक्षा केली जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देखील हा सण साजरा केला जातो. वसंत ऋतूची सुरुवात म्हणून देखील हा सण साजरा करण्याची प्रथा आहे.
गुढीपाडवा हा विजयाचे, आनंदाचे, मांगल्याचे, प्रगतीचे आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण आहे.
गुढीपाडवा हा विजयाचे, आनंदाचे, मांगल्याचे, प्रगतीचे आणि भरभराटीचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण आहे. भारतीय संस्कृतीमधील अनेक प्रवाहांच्या लोकांना आदरणीय असलेल्या शिवपार्वतीचा विवाह चैत्रात पार पडला त्याचे अनुकरण म्हणून या काळामध्ये अनेक विवाह पार पडले जातात.
गुढीपाडवा हा सण आपला हा नवीन वर्षाचा पहिला सण घराघरात मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक कुटुंब आपल्या पारंपरिक रीतीप्रमाणे हा सण साजरा करते.
नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

गुढीपाडवा दिनी अगदी शास्त्रोक्त पद्धतीने गुढी घराघरात उभारली जाते. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करतात.
कडुलिंब आणि गूळ एकत्र करून सर्वांनी औषध म्हणून या बदलणाऱ्या ऋतुचक्रामुळे शरीराला त्रास होऊ नये याकरिता गुढीपाडव्याच्या दिवशी सेवन करायचा असतो.
गुढीपाडवा दिनी महिला आपल्या घराच्या प्रवेशद्वारासमोर सुंदर सुबक रांगोळी काढली जाते. दरवाजाला सुंदर तोरण बांधले जाते. काही तरुण युवा, युवती मिरवणूकीच्या वेळी मिरवणुकीच्या मार्गक्रमणात स्वागताकरिता सुबक रांगोळी काढतात.
गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने संपूर्ण कुटुंब एकत्र आलेले असते. सगळे कुटुंबीय एकत्र आल्याने घरात श्रीखंड-पूरी, पुरणपोळी, बासुंदी आणि गुळपोळी असा गोडाधोडाचा स्वयंपाक केला जातो.
ही नवीन वर्षाची सुरूवात म्हणजे नवीन संकल्प घेण्याचा दिवस.
गुढीपाडवा हा दिवस सकारात्मकता आणि आनंदी जीवनासाठी शुभ दिवस मानला जातो.
गुढीपाडवा या दिवशी युवा पिढीद्वारे, विविध संघटना मार्फत विविध शोभायात्रा कला संस्कृती दर्शविणारे पारंपारिक कार्यक्रम साजरे करून जल्लोषात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाचे स्वागत केले जाते. या शोभा यात्रेत मुख्यता महाराष्ट्रात मराठी संस्कृती दाखविण्याचा युवाचा कळ असतो. लेझीम, ढोल हे या मिरवणुकीचे आकर्षण असते. महाराष्ट्रात स्त्रिया नववारी नेसून मराठमोळा साज करून नवीन वर्ष्याच्या स्वागता करिता सज्ज होतात.
महाराष्ट्र राज्यात गुढीपाडवा नावाने सर्वश्रुत असणारा हा आपला सण इतर राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या नावांनी, वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.
आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात त्याला युगादी असे म्हणतात, तर पंजाब मध्ये बैसाखी, काश्मीर मध्ये नवरेह, मणीपूर मध्ये सज्जीमनूई, सिंध प्रांतात चेटीचंड या नावांनी गुढीपाडवा सण पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा शुभारंभ करणारा सण असून, तो केवळ धार्मिक सण नाही तर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. या दिवशी नवे सकारात्मक संकल्प घेतले जातात, राबविले जातात. भारतीय संस्कृतीतील हा सण सौख्याचे, एकात्मतेचे आणि विजयाचे प्रतीक आहे.
भारतीय परंपरेमध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात पाडवा याचे खूप महत्त्व आहे . शिवपार्वती हे पिढ्यानपिढ्याचे संचित आहे. त्यांचा विवाह आपणा सर्वांसाठी चिरस्मरणीय आहे व गुढीपाडव्याच्या अनुषंगाने तो वर्षानुवर्षे स्मरला जात आहे.
गुढीपाडवा हा सण आपल्याला नवचैतन्य, उत्साह आणि समृद्धी प्रदान करो, ही शिवपार्वतीच्या चरणी प्रार्थना !